गुरुवार, २७ मार्च, २०१४

' विश्वंभर '

नवीन ओळख झाल्यावर ...त्याने मला नाव विचारले 
माझ्या फक्त ... मानवी देहाचे नाव सांगितले त्याला 
त्याचे समाधान झाले नाही ..आडनाव सांगा म्हणाला 
' विश्वंभर ' असे सांगूनही .... तो तसाच प्रश्नांकित 

त्याला हवी होती माहिती माझ्या कुळाची......मुळाची
कदाचित त्यावरच ठरणार होते ...या मैत्रीचे भवितव्य 
साहजिकच होते म्हणा ते ..कुत्री ..मांजरी पाळतानाही
त्यांच्या सात पिढ्यांची माहिती काढतोच की माणूस 

म्हणजे आडनावावरून ...माझी लायकी ठरणार तर
त्याला विचारांशी काही घेणे नव्हते जात पटली तरच
आमच्या घट्ट मैत्रीचे भवितव्य सुरक्षित असणार होते
मी एक मानव आहे ही माहिती तशी त्रोटकच होती की

मला माहित होते आडनाव सांगितले की तो तपासेल
त्याच्या दृष्टीकोनातून मला ..माझ्या नितीमत्तेला
माझ्या पुर्वजांवरून माझी परीक्षा होईल.. ज्यांना मी
कधी पहिलेही नव्हते..त्यावरूनच तो मला जोखणार

शेवटी मी आडनाव सांगितल्यावर मनातल्या मनात
तो ' वाटलंच ' असे पुटपुटला हे ऐकूनही मी निर्विकार
हे जाणवले तो जरा हात राखूनच बोलतोय माझ्याशी
त्याने तो पुरोगामी विचारांचा असल्याचेही सांगितले

इतिहासात तो अतिशय हुशार आहे हे पण जाणवले
फक्त आमचा दोघांचाही वर्तमान मात्र ठीक नव्हता
भविष्यही अधांतरीच होते आमच्या मैत्रीचे ..कारण
आम्ही दोघेही ...जखमा कुरवाळण्यात पटाईत होतो

आमच्या मनावर ..अनेक ऐतिहासिक ..सामाजिक
व्रण होते ......दोन माणसांमधील कधीच न संपणारे
अंतरच होते ते ..दोघेही विव्हळ होतो तरीही आम्ही
कुळाशी इमान राखणारे ....जातीसाठी माती खाणारे

...तुषार नातू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा