बुधवार, ५ फेब्रुवारी, २०१४

विसरायला हवा !

आयुष्यातल्या पहिल्या पेग ने दिलेला
उन्मादाचा ..सर्वशक्तिमान पणाचा
समस्या संपल्याचा ...मनमोकळी 
दाद देण्याचा ..तरल प्रतिभेचा 
तो अनुभव विसरायला हवा 

अर्थहीन वांझोटे तत्वज्ञान पाजळण्याचा
सारे चुटकीसरशी होईलच वाटण्याचा 
मेंदूला झिणझिण्या आणण्याचा
बुद्धीच्या कक्षा चौफेर होण्याचा
तो अनुभव विसरायला हवा

विनोदबुद्धीच्या फटकेबाजीचा..षटकारांचा
काटेरी ताशेरे ....फटकळ जबाबांचा
किसीसे भी नही डरते भासण्याचा
सर्व बाबतीतील तज्ञ झाल्याचा
तो अनुभव विसरायलाच हवा

आठवायला हवेत मला कुटुंबियांचे चेहरे
व्यर्थ गेलेले कोणाचे कष्टाचे पैसे
जिवनाबद्दलची उदात्त स्वप्ने
तुटणारे ते आईचे काळीज
पत्नीचे क्षणोक्षणी झुरणे
मुलांचे भविष्य उभारणे....

...तुषार नातू ! ( ४ फेब्रुवारी २०१४ )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा